आपण संकटात सापडलो की वेगवेगळ्या देवांकडे, देवऋषींकडे जातो; पण तिथे अर्थाचा अनर्थच होतो. हा देह म्हणजे पाच धाऱ्यांचे लिंबू आहे आणि या पाच धाऱ्या म्हणजे आपली 'पंचेंद्रिये' होत. या देहाला स्वतःची काहीच किंमत नाही, म्हणूनच तर आत्मा निघून गेल्यावर देह विसर्जित केला जातो. खरी किंमत त्या देहातील आत्म्याची आणि सद्बुद्धीची असते. ज्ञान मिळाले की देव मिळतो, नामस्मरण केले की देव मिळतो; भारुड हेच शिकवते. आपण जसा देवळात नारळ फोडतो, तसा आपण आपल्या मनातील मायारूपी नारळ फोडायचा असतो आणि अहंकाराचा कोंबडा मारायचा असतो. माणूस जेव्हा मोहाने संमोहित होतो, त्याच्या डोळ्यांवर मोहाचा पडदा पडतो, तेव्हा तो आपला-परका, वय, काळवेळ आणि नीती सर्वकाही विसरून जातो. त्यामुळे माणसाचे विकार आधी शांत व्हायला हवेत आणि तेही वेळेच्या आत, सुयोग्य वेळी शांत व्हावेत; कारण कर्माचे फळ मिळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नामस्मरण केले की देव मिळतो, हेच भारुड आपल्याला शिकवते. आपण आपले जीवन 'दुःखसागरा' ऐवजी 'दुग्धसागर' (दुधाचा सागर) बनवले पाहिजे.
रक्त-मांसाच्या या शरीराला आपण गोचडीप्रमाणे घट्ट चिकटून बसलो आहोत. संत एकनाथांनी यावर अनेक संदेश दिले आहेत. आपण मनाच्या मांडीवर बसून मनातच मांडे खात असतो. हे मन अधोगतीचे 'भूत'ही असू शकते किंवा आत्मोन्नतीचा 'दूत'ही असू शकते. भूत आपल्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या भावना देते. म्हणूनच नाथांनी—"भूत जबर मोठं गं बाई!" असं एक प्रसिद्ध भारुड लिहिले आहे. माणूस जर श्रद्धेने राहिला नाही, तर तो विकृत बनतो. सूप, चाटू यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंनाही नाथ महाराज देव मानतात; कारण आपले मन स्थिर नाही, पण या वस्तू स्थिर आहेत. माणसाला नेहमी काही ना काही हवे असते, म्हणून तो देवाला साकडे घालत सुटतो. त्याला क्षणिक आनंद हवा असतो. जी वस्तू हातात आली की तिची आसक्ती संपते; उदाहरणार्थ—लग्न झाले, घर मिळाले किंवा नोकरी मिळाली की माणसाची आसक्ती संपते आणि तो नव्या सुखाच्या मागे धावू लागतो. दैवी किंवा परम आनंदाची ओढ मात्र कोणालाच नसते आणि मानवाचे जीवन असेच संपून जाते.
"पावसा तू असा, मी असा" अशी गाणी गाणे, पाऊस पडावा म्हणून बेडकांचे लग्न लावणे किंवा कणकेचे दिवे करणे या गोष्टी अंधश्रद्धाच आहेत. संत एकनाथांचे एक भारुड आहे—"गव्हाचे दिवे शिजले मावशी..." यात एकाच वस्तूपासून अनेक वस्तू बनवण्याचे रूपक आहे. माणसाचे सर्व विचार आणि विकार एकाच मानसिकतेअंतर्गत कार्यरत असतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता (संयोजकता) या भक्तीच्या चार पायऱ्या भारुडात पाहायला मिळतात; पण आज मानवाने या पायऱ्याही विकून खाल्ल्या आहेत.
सिकंदराने संपूर्ण जग जिंकले, पण एका तत्त्वज्ञाने त्याला विचारले, "तू तुझ्या आत्म्यासाठी काय केलंस?" त्यावेळी खूप उशीर झाला होता आणि सिकंदराकडे याचे काहीच उत्तर नव्हते. म्हणूनच, प्रत्येक सिकंदराच्या प्रेताचे हात मृत्यूनंतर रिकामेच लटकत राहतात. शेवटी तिरडी ही बांबूचीच असते. दोन बांबू आणि पाच आडव्या पट्ट्यांच्या (पायऱ्यांच्या) बांधणीवर मानवाचे शरीर स्मशानापर्यंत नेले जाते आणि तिथेच सर्वकाही संपते. शेवटी रिकाम्या हातानेच वर जावे लागते. देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर जर योग्य ठिकाणी केला, तर कोणाचे भले होणार नाही का? नक्कीच होईल.
माणूस आठवणीने खाण्यासाठी गहू बाजारातून आणतो, ते त्याच्या अचूक लक्षात राहते. आपण प्रत्येक भौतिक वस्तूसाठी तडफडतो, नवा मोबाईल हवा म्हणून आसुसलेले असतो; पण 'आत्मा' मात्र साफ विसरतो. बाह्य सुखात आत्मा कधीच रमत नाही. वासनातृप्तीचे, खाण्यापिण्याचे आणि मजा करण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असूनही, आत्म्याला या गोष्टींबद्दल आसक्ती नसते; पण त्याचा उपभोग आत्म्याऐवजी हे शरीर घेत राहते. याउलट, आनंदाने विषाचा प्याला पिण्याची पायरी जी पार करते, ती मीरेची खरी भक्ती होय!
या जगात स्वयंभू काहीच नसते, जे काही उभे राहते ते मानवनिर्मित असते. माणूस आपल्या सत्कर्माने देव बनू शकतो. माणसाचा देव होईल, या आशेनेच भारुडात देवाला मानवी देह दिला गेला आहे. नाथांचे एक भारुड आहे—"तुम्हाला सांगते वेगळे निघा, वेगळे होऊन संसार करा!" याचा अर्थ 'वेगळ्या विचाराने जग बघा' असा आहे. संसारातील सर्व गैरसोयींमध्ये सुद्धा वेगळ्या, सकारात्मक नजरेने जगाकडे बघा, असा संदेश यात आहे. सायुज्यता म्हणजे विधीनाट्यासाठी लागणाऱ्या सुखसोयी जमवणे; संसारात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या परमार्थिक सुखातून मिळवा, असे नाथ महाराजांनी सुचवले आहे. एका भारुडात श्रीकृष्णाला तराजूच्या पारड्यात तोलले गेले, तेव्हा देवच इतर सर्व ऐहिक वैभवापेक्षा श्रेष्ठ ठरला, असे वर्णन आहे.
या जगात नवरा किंवा मुले ही देखील शेवटी परकीच असतात (कोणी कोणाचे नसते). ऐहिक सुख मागण्यासाठी नवस करून देवाला साकडे घातले जाते. देवाला काहीतरी देऊन, त्याच्या बदल्यात काहीतरी मागितले जाते. नवस फेडण्याच्या बहाण्याने साम-दाम-दंड-भेद वापरून देवाकडून जणू 'वसूली'च केली जाते आणि देवाला आपल्या मनासारखे वागायला भाग पाडले जाते, असा एक मोठा गैरसमज माणसाने करून घेतला आहे. मनुष्याचा प्रत्येक देह वेगळा, त्याचे प्रत्येक रूप वेगळे असले, तरी मानवाची जात एकच आहे. त्याचप्रमाणे देवाची रूपे निराळी असली, तरी त्यातील आदिशक्ती एकच असते. नित्य दर्शनात येणारे पिंगळा, वासुदेव, गोंधळी यांच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी ही भारुडे जनमानसात पसरवली. संवत्सरे बदलतात, काळ बदलतो, पण भारुडांतील हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. सुरवंटाचे फुलपाखरू जेव्हा कोषातून बाहेर पडते, तेव्हा त्याची ती तडफड बघवत नाही; पण ती धडपड प्रत्येकाला स्वतःची स्वतःच करावी लागते. त्याच धडपडीमुळे त्या फुलपाखराचे पंख आणि पाय मजबूत होतात. जगण्यासाठी ही धडपड मानवाला जन्मापासूनच करावी लागते. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडांमध्ये, भविष्यात 'स्त्रीभ्रूणहत्या' होतील की काय, अशी भीती त्या काळातच व्यक्त केली होती. एक सुंदर फुलपाखरू बनण्यासाठी (म्हणजेच जीवनाचे सार्थक करण्यासाठी) वेदना सोसाव्याच लागतात, असे भारुडे आपल्याला सांगतात.
खायला आणि जेवणावळीला लोक फुकट जमतात, पण 'भूत' दिसले की पळून जातात. हे भूत म्हणजे दुसरे काही नसून माणसावर आलेले संकट, आजारपण किंवा त्याची गरज सुद्धा असू शकते. माणसाला नेहमी एका गोष्टीच्या पाठीमागे दुसऱ्या गोष्टीची ओढ लागते. मानव हा या जगात केवळ एक भाडेकरू आहे. परमेश्वर या देहरूपी घरातून मानवाला कधी बाहेर काढेल, हे सांगता येत नाही; कारण माणसाच्या आयुष्याची कोणतीही वॉरंटी किंवा गॅरंटी नसते. म्हणूनच, आत्मा निघून गेल्यावर या प्रेतरूपी देहाला नंतर काहीही किंमत उरत नाही. जीवनकथेच्या मधले शब्द बदलण्याचे (म्हणजेच कर्म करण्याचे) स्वातंत्र्य देव मानवाला देतो; पण या जीवनपटाचा अंत म्हणजेच 'क्लायमॅक्स' मात्र देवानेच ठरवलेला असतो. आपले जीवन सात्त्विक राहावे आणि आध्यात्मिक साधनेने समाजाचे प्रबोधन होत राहावे, हाच त्यामागचा हेतू असतो. जीवन म्हणजे केवळ मनोरंजन नसून त्याला नैतिकतेचे अधिष्ठान हवे आणि शब्दांचे मनाशी पवित्र नाते हवे, असे एकनाथ महाराज भारुडांमधून सांगतात.
सुरवातीला प्रत्येकच गोष्ट अवघड वाटते, पण पुढे सराव आणि अनुभवामुळे ती सोपी वाटू लागते. भारुडांमध्ये मानवाचे सर्व विकार आधी देवावर टाकले जातात आणि शेवटी त्यातून सद्गुणांचा एक सुंदर संदेश दिला जातो. उदाहरणार्थ— अति दानाने किंवा इतरांवर अतिदया करून स्वतःला रस्त्यावर आणायचे का? तर नाही; यथाशक्ती थोडे दान करावे आणि विषयरूपी भूतांपासून दूर राहावे. देव मिळणे सोपे नाही, तो काही बाजारात मिळणारा भाजीपाला नाही की जो पैशाने विकत घेता येईल, असे भारुड आपल्याला शिकवते.
संत एकनाथ महाराजांची 'भूत जबर मोठं गं बाई', 'विंचू चावला', आणि 'काट्याच्या अणीवर वसली तीन गावं' ही भारुडे अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. हा लेख वाचल्यावर यातले किमान एक तरी भारुड तुम्ही जरूर ऐका; त्यातला संगीतमय आणि आध्यात्मिक आनंद खरोखरच वेगळा असतो!
.jpg)




Post a Comment
0 Comments