ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष सुनील उतेकर हे मागील सहा महिन्यांपासून महापौर, आयुक्त तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संस्थेच्या मागणीनुसार दिनांक 13 जून 2026 रोजी आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वालधुनी नदीचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यामध्ये नदीतील वाढते प्रदूषण, सांडपाणी व घनकचरा याबाबत सविस्तर पाहणी करण्यात आली.
त्यानंतर माननीय महापौर व आयुक्त यांनी ठोस भूमिका घेत उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांना त्यांच्या क्षेत्रातून वालधुनी नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नोटीस क्रमांक 521, दिनांक 23 जून 2026 रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत संबंधित संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या पाहणी दौऱ्यास संस्थेचे पदाधिकारी विशांत कांबळे, गणेश कांबळे, सुरेश अहिरे, सुनीता खेताडे, सुरेखा दिविलकर, रसिका बागवे, अनिल सरदार तसेच विविध स्थानिक संस्था व नागरिक उपस्थित होते. आयुक्तांनी घेतलेल्या या सकारात्मक व ठोस निर्णयाचे संस्थेने स्वागत केले असून, वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आवश्यक कामांना तात्काळ सुरुवात करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments