सामाजिक संस्थेकडून नाहक आरोप
“तीन सुनावण्यांना आम्ही हजर, संस्था गैरहजर”. .. ......त्रस्त कुटुंबीय
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
अहिल्यानगर येथील उडान प्रकल्प स्नेहालय संस्थेकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे एका कुटुंबाला न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागत असून, संबंधित नातेवाईकांनी या कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धनश्री रवींद्र जाधव (लग्नाआधीचे नाव) ही मुलगी अल्पवयीन असताना, म्हणजेच 18 वर्ष पूर्ण होण्यास काही महिने बाकी असताना, नात्यातील एका मुलासोबत प्रेमसंबंधात होती. त्या काळात तिने आत्महत्येची धमकी देत घरच्यांवर दबाव आणला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ टाळण्यासाठी कुटुंबीयांनी तिच्या इच्छेनुसार विवाहास सहमती दिली, असे नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे.
लग्नानंतर ती संबंधित मुलासोबत सुमारे दोन वर्षे राहिली आणि त्या काळात तिला एक मुलगा झाला. मात्र, पुढे ती स्वतःहून त्या घरातून निघून आजी-आजोबांकडे परत आली. त्यानंतर तिच्याच आग्रहामुळे दुसऱ्या व्यक्तीशी विवाह लावण्यात आला. त्या व्यक्तीची पत्नी मृत झालेली होती. या विवाहातही तिने पाच ते सहा वर्षे संसार केल्यानंतर पुन्हा तो संबंध तोडून आजी-आजोबांकडे परतल्याचे सांगण्यात येते.
पुढे ती एका नातेवाईकांच्या घरी राहू लागली. कुटुंबीयांनी तिला परत आणण्याचा प्रयत्न केला असता, तिने येण्यास नकार दिला. त्यानंतर ती अहिल्यानगर येथील उडान प्रकल्प स्नेहालय संस्थेत दाखल झाली.
यानंतर संस्थेकडून मुलगी अल्पवयीन असताना विवाह लावल्याच्या कारणावरून आजी-आजोबा, मावशी व काकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नातेवाईकांचा ठाम दावा आहे की, हा निर्णय त्यांनी जबरदस्तीने नव्हे तर मुलीच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी परिस्थितीपोटी घेतला होता.
दरम्यान, नातेवाईकांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांनी प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजेरी लावली असून, आतापर्यंत तीन वेळा कोर्टात उपस्थित राहिले आहेत. परंतु, ज्यांनी तक्रार दाखल केली त्या स्नेहालय संस्थेचे प्रतिनिधी या तिन्ही सुनावण्यांना गैरहजर राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, संस्थेकडून मुलीला भेटण्यास मज्जाव केला जात असून, कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मयत आजोबांचेही नाव समाविष्ट करण्यात आल्याने नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
उडान प्रकल्प स्नेहालय संस्थेचे संस्थापक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. सध्या या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, नातेवाईकांनी न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments