रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
गटाच्या माजी नगरसेविका मनिषा रणदिवे
व राजू रणदिवे यांनी नोंदवली हरकत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचना पॅनल प्रणालीतील अशोक नगर व शिवाजी नगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयने हरकत घेतली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी नगरसेविका मनिषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे, मंगल पाठारे, जितू अहिरे, सचिन चंदने, अमोल पंडित यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकत नोंदवली आहे. अशोक नगर व शिवाजी नगर हे प्रभाग कल्याण पूर्व पॅनलमध्येच समाविष्ट करण्यात यावेत. रामबाग, कर्णिक रोड रोड, जोशीबाग व पश्चिमेकडील प्रभागाशी जोडण्यांचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्लामसलत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत प्रभागाची नैसर्गिक व भौगोलिक विभागणी मोडीत काढली. अशोक नगर व शिवाजी नगर हे ऐतिहासिक दृष्टया कल्याण पूर्व भागाशी जोडलेले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व सुविधा, बाजारपेठ, शाळा, शासकीय कार्यालये, रेल्वे स्थानक यांचा उपयोग हा पूर्णपणे कल्याण पूर्वकडे केंद्रित आहे. तरीसुध्दा सध्याच्या पॅनल रचनेत या दोन्ही प्रभागांना राजकीय हेतूने कल्याण पश्चिमेकडे जोडण्यात आले आहे. हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे.
लोकसभा व विधानसभा कल्याण पूर्वेची असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुलभा गायकवाड आहेत. या दोन्ही प्रभागातून दिल्ली कडे जाणाऱ्या रेल्वेलाईन आहेत. रेल्वे लाईन, नदी, मोठे रस्ते असतील तर त्या ओलांडून वॉर्ड करण्यात येऊ नये असे आदेश असतांना, या सर्व बाबी अशोक नगर शिवाजी नगर याठिकाणी येत असून मतदारांना व नागरिकांना पलीकडे जाण्यास कुठलीही सोय नाही. स्थानिक उमेदवारांना नागरीकांचे प्रश्न व समस्या व्यवस्थीत माहिती असतात. परंतु कल्याण पश्चिम भागाशी जोडल्यास या परिसरातील नागरिकांना बाहेरील, अनोळखी उमेदवाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे स्थानिकांचे मताधिकार व प्रतिनिधित्व दिशाभूल होऊन कमकुवत होईल.
अशोक नगर, शिवाजी नगर, तसेच लगतची आनंदवाडी व मिलिंद नगर हया वस्त्या मोठया प्रमाणावर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मजूर वर्ग व सामाजिक दृष्टया दुर्बल घटकांनी वसलेली आहेत. या भागातील नागरिकांचे प्रश्न वेगळे, ठोस व तातडीचे आहेत. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, मुलभूत सुविधा पाणीपुरवठा, रस्ते, गटार, शाळा व आरोग्यसेवा, रोजगार व उदरनिर्वाह या समस्यांची जाण असणारा स्थानिक नगरसेवकच योग्य तो निर्णय घेऊ शकतो. परंतू जर हा प्रभाग कल्याण पश्चिममध्ये जोडला तर येथील समस्यांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे.
अशोक नगर व शिवाजी नगर येथील नागरिकांची बहुतेक कामे कल्याण पूर्वमधील शासकीय कार्यालयांशी निगडीत आहेत. जर हे प्रभाग पश्चिममध्ये जोडले गेले तर नागरिकांना अनावश्यक अडचणी व त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे ही विभागणी न्यायालयीन दृष्टीनेही अनुचित व आक्षेपार्ह ठरू शकते असे या हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments