ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
संत निरंकारी मिशन हरित जाणीवेला आणि पर्यावरणाप्रती अतूट समर्पणाला निरंतर वृद्धिंगत करत रविवारी, 17 ऑगस्टला 'वननेस वन' उपक्रमाच्या पाचव्या चरणांतर्गत देशभरातील अनेक नवीन ठिकाणे या जनसामुदायिक अभियानाशी जोडेल. सकाळी 6 ते 9 दरम्यान हजारो सेवादार आणि श्रद्धाळू भाविक एकत्रितपणे वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गाप्रति आपली निष्ठा व त्याच्या संरक्षणाचा संकल्प याचा पुनरुच्चार करतील.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली 2021 मध्ये सुरू झालेली ‘वननेस वन’ परियोजना ही केवळ एक वृक्षारोपणाचा उपक्रम यापुरते मर्यादित नसून ते निसर्गाशी समतोल व सह-अस्तित्वाची भावना जागृत करणारे एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. आपण निसर्गापासून वेगळे नसून त्याचाच एक अविभाज्य अंग आहोत ही भावना या अभियानातून शिकवली जाते. तद्वत या निसर्गाचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनाचे आणि भविष्याचे रक्षण करणे होय.
वृक्षांच्या या रोपट्यांनी इतकी घनता प्राप्त केली आहे की ती आता एका ‘लघु वनाचे’ स्वरूप धारण करु लागली आहेत. हे परिवर्तन केवळ बाह्यरूपी हिरवळी पुरते मर्यादित न राहता, आता या लघु वन प्रदेशात अनेक प्रवासी व दुर्मिळ प्रजातींचे पक्षीही आश्रय घेऊ लागले आहेत, ज्या प्रजाती पूर्वी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होत्या. जैवविविधता व पर्यावरणीय समतोल राखण्यात या सर्व सजीवांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 'वननेस वन' अभियान हे केवळ पर्यावरणाच्या रक्षणाचे माध्यम नाही, तर मानव आणि निसर्ग यामध्ये पुन्हा एकदा आत्मिक नातेसंबंध स्थापित करत आहे. एक असे नाते जे खऱ्या अर्थाने 'एकत्वाचे' प्रतीक आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘वननेस वन’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 600 हून अधिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही केवळ हिरवळ वाढवण्याची मोहिम नसून, लघु वनांच्या रूपात एक शाश्वत आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक यथायोग्य प्रयत्न आहे. मिशनचे स्वयंसेवक या वृक्षरोपांची देखभाल अत्यंत श्रद्धा व समर्पणाने करत आहेत, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक रोपटे हे केवळ एक वृक्ष नसून भावी पिढ्यांच्या श्वासांचा आधार आहे.
Post a Comment
0 Comments