गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २८ वे वर्ष आहे.श्री गणेश मंदिराच्या पुढाकारातून साजरा होणारा हा गावकीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. विशेष म्हणजे यंदाच्या स्वागत यात्रेच्या संयोजन समितीत मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग असून, नियोजनात तरुणांचा यात्रेतील सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण भारतात निघणाऱ्या स्वागतयात्रांची सुरुवात करून देणारं शहर, अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा वंदे मातरम चे १५० वे वर्ष या विशेष संकल्पनेवर आधारित असणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आयोजित पत्रकार परिषदेत या नववर्ष स्वागत यात्रेबाबत माहिती देण्यात आली. 
या पत्रकार परिषदेला कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सचिव प्रविण दुधे, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, श्रीपाद कुलकर्णी, गौरी कुंटे, राजय कानिटकर आणि संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे उपस्थित होते.
गुरुवारी १९ मार्च रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा करण्यात येईल. पंचांग वाचन, श्रीराम महापूजा, प्रतिनिधीक गुढी उभारणी तसेच श्री गणरायाच्या पालखीचे पूजन होऊन ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत यात्रेसाठी प्रस्थान होईल.ही स्वागत यात्रा भागशाळा मैदान येथून सकाळी सव्वा सात वाजता सुरू होईल. भागशाळा मैदान, पंडित दीनदयाल पथ, द्वारका हॉटेल, रेल्वे मार्ग, शिवमंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, चार रस्ता मानपाडा रोड,बाजीप्रभू चौक, फडके पथ आणि आप्पा दातार चौक या मार्गे पालखीसह यात्रा मार्गक्रमण करेल. यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत किमान १०० च्या आसपास संस्था विविध प्रकारे सहभागी होतील अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
या अनुषंगानेच शनिवारी ७ मार्च रोजी डोंबिवलीतील ३७ शाळांमधील सुमारे १८०० विद्यार्थी सामुदायिक देवदेशोपासना आणि ‘वंदे मातरम्’ गायनात सहभागी होणार आहेत. रविवारी १५ मार्च रोजी अथर्वशीर्ष पठण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन, वादन-नृत्य स्पर्धा, तरुणांसाठी आकर्षण असणारी बाईक रॅली, मंगळवारी 17 मार्च रोजी सामुदायिक श्रीसूक्त पठण आणि दीपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी भागशाळा मैदान येथे ‘शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा’ या गीत-नृत्याविष्कारातून, छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. वक्फ विधेयकात महत्वाची भूमिका मांडणारे, आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच नियोजन आणि जबाबदारी असणारे नाशिक येथील महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज उपस्थिताना मार्गदर्शन करतील.
.jpg)


Post a Comment
0 Comments