ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर कालपासून ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे बारवी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी खाडी आणि नदीकिनारच्या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या आकडेवारीचा विचार करता गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीत १७२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला काल पासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच बारवी धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या अकरा दरवाजांमधून तब्बल 236 क्युसेक इतका प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. परिणामी एकीकडे मुसळधार आणि दुसरीकडे बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीद्वारे कल्याणच्या नदीकिनारी असलेल्या वालधुनी, योगीधाम, रिंगरोड अशा अनेक सखल भागात शिरले आहे. तर पुढे हेच पाणी कल्याण खाडीलाही जाऊन मिळत असल्याने दुर्गाडी गणेश घाट, रेतीबंदर परिसर जलमय झाला. त्यासोबतच शहाड मोहने, योगीधाम, गौरीपाडा सिटी पार्क, भवानी नगर, कल्याण पूर्वेतील अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वालधुनी परिसरातील अनेक चाळी आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
केडीएमसीचा ड्रिम प्रोजेक्ट सिटी पार्क कोट्यवधी रू खर्च करून सुमारे 35 एकर मध्ये साकरला आहे. वालधूनी नदीला लागून सिटी पार्कला रिटनिंग वाँल बांधून देखील यंदाही पावसाच्या पुराचे पाणी सिटी पार्क मध्ये शिरल्याने बच्चे कंपनीची खेळणी, विद्युत प्रकाश योजनेला यांचा फटका बसल्याने देखभाल दुरूस्ती प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. जाणाकारांच्या मते सिटी पार्क वालधूनी नदीलगत कांदळवन साकरत पूर परिस्थितीवर नियंत्रण आणावे.
उल्हासनदी पात्रातील पाणी केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरल्याने खबरदारीची उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. परिणामी संपूर्ण अ प्रभाक्षेत्र, ब प्रभाक्षेत्राचा काही भाग आणि जे प्रभाग क्षेत्रातील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच काळू नदीवरील टिटवाळा जॅकवेलमध्ये ही पाणी आल्याने टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र सकाळी ८.३० वाजेपासून बंद करण्यात आले आहे. मात्र जलशुद्धीकरण केंद्रात कुठलाही बिघाड झालेला नसून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले.
तर रायते पुलावरून पाणी वाहू लागल्याने काल रात्रीपासून बंद असणारा कल्याण - मुरबाड मार्ग आजही बंदच आहे. त्यातच याला पर्यायी असणारा टिटवाळा - रायते मार्गही पाण्याखाली गेल्याने हा मार्गही बंद झाल्याने अनेकांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. उल्हास नदी काळू नदी वालधुनी नदी, या तिन्ही नद्यांना पूर आल्याने याचा फटका गावांना देखील बसला आहे. तिन्ही नद्यांचा पाणी कल्याणच्या खाडीला मिळत असल्याने व तसेच आज समुद्राला भरती असल्याने खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने खाडी किनारी असलेली नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. तसेच तबेला मध्ये देखील पाणी शिरल्याने हजारो म्हशींना गोविंदवाडी बायपास पूलावर रस्त्यावर बांधण्यात आले आहे.
कल्याण ग्रामीण मध्ये काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक गावाचे संपर्क तुटले आहेत. कल्याण नगर रोडच्या महामार्गचे काम देखील सुरू आहे, त्यामध्ये रायते नदी परिसरात अडकलेले नॅशनल हायवेचे 30 कामगार पोकलेनच्या सहाय्यने सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
Post a Comment
0 Comments