आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील
जनजागृतीची प्रभावी मोहीम
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची शान असलेली परंपरा आहे. याच पवित्र वारीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे – "दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची". मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल वॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. “संकटाला घाबरू नका, सज्ज राहा” असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिनांक १९ जून पासून वारी बरोबर प्रारंभ झालेला या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाले आहे. दिनांक ६ जुलै आषाढी एकादशी पर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे दर्शन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे. वारीत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभाव, कीर्तन, रिंगण, अभंग गजरात रंगलेली असते, तिथेच ही "दिंडी सजगतेची" आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेऊन शांतपणे आपले कार्य करत आहे.
वारकऱ्यांनी या चित्ररथांचे आणि माहिती स्टॉल्सचे स्वागत केले असून, “सजग व सुरक्षित वारी” ही संकल्पना सर्वांच्या मनात घर करत आहे.राज्य शासनाचा स्तुत्य उपक्रम हा उपक्रम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. लाखो वारकऱ्यांचे या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रबोधन होत आहे.
Post a Comment
0 Comments