Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी स्थायी समिती बैठकीत 20 प्रस्तावांना मंजुरी, 15 प्रस्ताव स्थगित


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या अजेंड्यात एकूण 35 विषयांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 20 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर विविध कारणांमुळे 15 प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांनी या 20 प्रस्तावांना अधिकृत मान्यता दिली.

बैठकीदरम्यान शहराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सदस्यांनी आपापली मते मांडली. विशेषतः सदस्य दीपेश म्हात्रे यांनी फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येकडे ठामपणे लक्ष वेधले. शहरात फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत असून त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी ठोस धोरण आखून प्रभावी कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तक्रारींच्या आधारे वॉर्ड अधिकाऱ्यांनी काही दुकाने सील केली, ती कारवाई योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवरही बैठकीत तीव्र चर्चा झाली. दीपेश म्हात्रे यांनी नाल्यांच्या साफसफाईत होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित करत, पावसाळा जवळ आला असतानाही संबंधित विभागाकडून अद्याप टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली. वेळेत नाला साफसफाई सुरू न झाल्यास पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या मुद्द्यावर इतर सदस्यांनीही चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी केली. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्भवते, त्यामुळे यंदा वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे सदस्यांनी नमूद केले.

बैठकीच्या शेवटी प्रशासनाला प्रलंबित प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये.


Post a Comment

0 Comments